कच्छ - मुंबई सरकारच्या ताब्यांतील देशी संस्थान.

कच्छ - मुंबई सरकारच्या ताब्यांतील देशी संस्थान.  
मर्यादा - उ. व. वा. सिंधप्रांत; पू. पालनपूर एजन्सींतील देशी संस्थानें द. काठेवाडचें द्वीपकल्प व कच्छचें आखात; व नैऋत्येस हिंदी महासागर.  याची लांबी पूर्वपश्चिम १६० मैल व रुंदी दक्षिणोत्तर ३५ ते ७० मैल आहे.  कच्छचें रण सोडून याचें क्षेत्रफळ ७६१६ चौ. मै. असून त्यांत ८ मोठीं गांवें व ९३७ लहान खेडीं आहेत.  कच्छचा महाराव भूज येथें रहातो.  हिंदुस्थानच्या इतर भागांपासून तुटकपणा, येथील लोकांचे विशिष्ट गुणधर्म, त्यांची निराळी भाषा, त्यांच्या राजासंबंधी वाटणारी त्यांची विलक्षण भक्ति, वगैरे गोष्टींवरून मुंबई इलाख्याच्या इतर संस्थानांपेक्षा हें एक निराळें राष्ट्र असावें असें वाटतें.

स्वाभाविक वर्णन - उत्तरेस मोठें रण, पूर्वेस छोटें रण, दक्षिणेस कच्छचें आखात व पश्चिमेस अरबी समुद्र असल्यामुळें हा प्रदेश हिंदुस्थानापासून बहुतेक वेगळा आहे.  जरी एकंदरींत हा देश रुक्ष, ओसाड व खडकाळ असला तरी डोंगराच्या रांगा व तुटक शिखरें, नद्यांचीं खोल पात्रें, लागवड केलेली खोरीं व चराईच्या जागा, यांमुळें याला विविधता प्राप्‍त झाली आहे.  दक्षिणेकडील वालुकामय उंच किनार्‍याच्या आंतल्या बाजूस २० ते ३० मैल रुंदीचा सखल सुपीक व चांगली लागवड केलेला प्रदेश आहे.  त्याच्या पलीकडे पश्चिमेस खुद्द कच्छमधील, पूर्वेस वागदमधील व उत्तरेस रणबेटांतील डोंगर जातात.  कच्छच्या डोंगरांत धिनोधरचें शिखर सुमारें १००० फूट उंच असून तेथें पूर्वी ज्वालामुखी पर्वत असल्याबद्दल प्रसिद्धी आहे.  झूरा व वारार हीं शिखरें सुमारें ९०० फूट उंच आहेत.  इतर डोंगर फार उंच नाहींत.

वर्षभर ज्यांनां पाणी असतें अशा नद्या कच्छमध्यें मुळींच नाहींत.  पावसाळ्यांत मध्य डोंगरांतून उत्तरेकडे व दक्षिणेकडे पुष्कळ प्रवाह जातात.  उन्हाळ्यांत त्यांचें पाणी कमी होऊन मधून डबकीं मात्र शिल्लक राहतात.  वरवर डोंगरांत बांध घालून एक तळें केलेलें आहे.  त्याला सरोवर असें म्हणतात.  कच्छच्या मोठ्या रणाच्या पश्चिमेस सिंधी नांवाचे एक तळें अलेक्झांडरच्या वेळेपासून (इ. स. पू. ३२५) अस्तित्वांत असून, सिंधू नदीचें पाणी कमी जास्त मिळेल त्याप्रमाणें ह्या तळ्याचें पाणी कधी खारें तर कधीं गोड असतें.

क्षारयुक्त ओसाड प्रदेशाचे विशिष्ट धर्म, ज्वालामुखी पर्वतांतून बाहेर आलेले बासाल्ट दगड व डोंगराच्या पायथ्याशीं असलेले अग्नीच्या योगानें तुटलेले कडे यांवरून कच्छमधील ज्वालामुखींचा जोर किती होता हें समजून येतें.  हल्लीं येथें ज्वालामुखीचे स्फोट होत नाहींत.  परंतु धरणीकंप होतात.  गेल्या शतकांत, १८१९, १८४४, १८४५ व १८६४ या सालीं कच्छमध्यें धरणीकंप झाले.  १८१९ चा धक्का सर्वांत जोराचा होता.  त्यावेळीं भूज येथील रावच्या राजवाड्यासुद्धां ७००० घरांचा नाश होऊन त्यामध्यें ११५० माणसें दबून मेलीं.  प्रत्येक किल्ल्याचें थोडें बहुत नुकसान झालें.  परंतु पश्चिमेकडील तेराचा सर्वांत मजबूत किल्ला पार जमीनदोस्त झाला.  कच्छच्या रणामध्यें पुष्कळ ठिकाणची जागा दबून गेली.  सिंधीच्या आजूबाजूला १६ मैलपर्यंत जागा एकदम ८ पासून १२ फूटपर्यंत खचून त्या ठिकाणीं सरोवर तयार झालें; व सिंधीच्या उत्तरेच्या सपाट मैदानांत धरणीकंपानंतर १० ते १८ फूट उंचीचा व ५० मैल लांबीचा नवीन प्रदेश दिसूं लागला.  सिंधू नदीच्या जुन्या पात्रांत हा प्रदेश एकदम उत्पन्न झाल्यामुळें त्याला अल्लाबंद म्हणजे देवानें घातलेला बांध असें नांव मिळालें आहे.

कच्छमध्यें झाडें फारच थोडीं आहेत.  निंब, पिंपळ, बाभुळ हीं झाडें खेड्यांतून आढळतात.  वड व चिंच हीं झाडें क्वचित दिसतात व अंब्याचें झाड करण्यास पुष्कळ मेहनत घ्यावी लागते.

कर्क वृत्ताशी समांतर रेषेंत हा देश वसल्यामुळें, नैर्ॠत्येकडील मनसून वारे येथें येत नाहीत.  १९०३ पूर्वीच्या दहा वर्षांत वार्षिक पाऊस सरासरी १२.६ इंच होता.  किनार्‍याची हवा वर्षभर सुखावह असते.  इतर ठिकाणची हवा ९ महिने थंड व आरोग्यकारक असते.  परंतु एप्रिल व मे आणि आक्टोबर व नवंबर या महिन्यांत उन्हाळा फार होतो.

इतिहास - ग्रीक ग्रंथांमध्यें कच्छचा उल्लेख आलेला आहे.  अलेक्झांडरला (इ.स.पू. ३२६) रणच्या पाण्याची माहिती होती.  १५० वर्षांनंतर त्याचा समावेश मेदनेरच्या राज्यांत झाला व नंतर लवकरच तें शकांच्या ताब्यांत गेलें.  त्यांच्यामागून पार्थियन आले.  इ.स. १४० व ३९० यांच्या दरम्यान सुराष्ट्र येथील क्षत्रप कच्छवर राज्य करीत होते.  कांहीं काळपर्य्रंत, हा देश मगधचे गुप्‍तराजे व पुढें वल्लभी राजे यांच्या हातांत राहून, सातव्या शतकांत सिंधमध्यें सामील झाला.  ह्यानंतर चारण, काठी व चावडा लोकांनीं त्यावर स्वार्‍या केल्या.  नवव्या शतकांत अरब लोक येथील किनार्‍यावर येऊन राहिले.  १०२३ त, अनहिलवाडचा पहिला भीमदेव व गझनीच्या महंमुदापासून पळून कानखोत येथें आला; व त्या शतकाच्या अखेर सिंधचा सूम्र राजा सिंगहार यानें हा देश काबीज केला.

चवदाव्या शतकांत सिंधच्या सम्मा रजपुतांनीं जिंकिल्यापासून कच्छच्या अर्वाचीन इतिहासाला प्रारंभ होतो.  सुम्रांच्या जुलुमाला कंटाळून आलेल्या ह्या लोकांना, येथील चावडा रजपुतांनीं राहण्यास जागा दिली.  पण सम्मा लोकांनीं आपल्या आश्रयदात्यांचें राज्य घेऊन त्या ठिकाणीं स्वतः राज्य स्थापन केलें (१३२०).  सम्मा वंशांतील जोजाड राजा त्याच्या नांवावरून जाडेजा लोक आपल्याला संबोधूं लागले.  सम्मा रजपुतांच्या राजघराण्याला जाडेजा ''जाडचे पुत्र'' असें म्हणत; त्यांचा धर्म हिंदु व मुसुलमानी धर्माच्या मिश्रणानें झालेला होता.  आपल्या जातीपासून वेगळें झाल्यामुळें त्यांच्या मुलींनां योग्य पती मिळेनासे झाले, म्हणून लहान मुलींना मारून टाकण्याची वाईट चाल त्यांच्या मध्यें पडली व ती अगदीं अलीकडच्या काळापर्यंत चालू होती.

इ.स. १४५० पर्यंत जाडेजांच्या तीन शाखा कच्छवर राज्य करीत होत्या.  १४५० त जाम हमीराचा मुलगा खेंगार यानें अहमदाबादच्या मुसुलमान राजाच्या साहाय्यानें सर्व देश आपल्या ताब्यांत आणिला.  शिवाय त्या राजानें काठेवाडच्या उत्तरेकडील मोर्वी देऊन राव ही पदवी दिली.  खेंगारचा चुलता जामरावळ यानें काठेवाडांत पळून जाऊन हल्लींचें नवानगरचें घराणें स्थापन केलें.  खेंगार अहमदाबादच्या राजांनां खंडणी देत नसे.  पण त्याच्या ५००० घोडेस्वारानिशीं लष्करी मदत द्यावी लागे.  खेंगारच्या मुलानें पूर्ण स्वतंत्र होण्याचा प्रयत्‍न केला.  परंतु १५९० ते १५९१ या दोन वर्षी त्याचा पराभव होऊन, त्याला मोगलांची सत्ता कबूल करावी लागली.  मक्केस जाणार्‍या यात्रेकरूंना वाट देण्याच्या अटीवर जहांगिरानें ही खंडणी माफ केली.  सहा पिढ्यांपर्यंत रावांची गादी वडील मुलाकडे चालत राहिली.  पुढें १६९७ त रायधानच्या मरणानंतर त्याचा तिसरा मुलगा प्रागजी यानें वडील भावांचे खून करून गादी बळकाविली.  भावाच्या मुलाला शांत करण्याकरितां त्यानें त्याला मोर्वीवर स्वतंत्र नेमिलें.  अद्याप मोर्वी त्याच्या वंशजांच्या ताब्यांत आहे.  गुजराथच्या सुभेदारानें १७१८ त कच्छवर पुष्कळ स्वार्‍या चालविल्या.  पण त्यांचा कांहीं उपयोग झाला नाहीं.  १८६२ च्या सुमारास कच्छमध्यें बंड उद्भावून रावाची बुद्धिभ्रष्टता व निरनिराळ्या पक्षांतील भांडणें यांमुळें राज्यांतील अव्यवस्था फारच वाढली.  अखेर १८१५ त इंग्रजाशीं तह होऊन इंग्रजांनीं देशांत शांतता राखण्याचें कबूल केलें.  व त्याच्या मोबदला त्यांनां अंजारचा किल्ला व दुसरीं २३ गांवें देण्यांत आलीं.  देशांत शांतता स्थापन झाल्यावर राव इंग्रजांशीं राजनिष्ठ राहीला.  परंतु त्याच्या दुर्व्यसनांनीं व क्रूरपणानें कंटाळून जाऊन जाडेजा सरदारांनीं १८१८ त इंग्रज सरकारची मदत मागितली.  रावानेंहि लढाईची तयारी केल्यामुळें इंग्रज सैन्यानें त्याच्यावर चाल करून भूजचा किल्ला सर केला व त्याला पदच्युत करून त्याच्या जागीं जाडेजा सरदारांनी निवडलेला अज्ञान राजा गादीवर बसविला; व तेथें आपला रेसिडेंट ठेविला.  ब्रिटिशांनां मिळालेला अंजार जिल्हा वार्षिक कांहीं रक्कम घेण्याचें कबूल करून कच्छला परत देण्यांत आला.  १८३४ त राव वयांत आल्यावर त्याच्या नांवानें सत्ता चालविणारें मंडळ मोडून टाकण्यांत आलें.  रावाला ब्रिटिश सरकारकडून सनद मिळालेली आहे.  त्याअन्वयें त्याला दत्तक घेण्याचा अधिकार प्राप्‍त झाला आहे.  रावाला २१ तोफांची सलामी मिळते.  हल्लींचे संस्थानिक महाराव श्रीखेंगरजी सवाई बहाद्दूर आहेत.  यांनां जी. सी. एस. आय; जी.सी.आय.ई. वगैरे पदव्या आहेत.  १९२१ सालीं हिंदी संस्थानिकांतर्फे लंडन येथें भरलेल्या वसाहतींच्या परिषदेला महाराव हजर राहिले होते.

लोकसंख्या - अठराव्या शताकाच्या मध्य कालांत त्या नंतरच्या पुष्कळ वर्षांपेक्षां लोकसंख्या बरीच जास्त होती असा समज आहे.  अठराव्या शतकाच्या शेवटीं राज्यांतील अव्यवस्था, फत्ते महंमदानें चालविलेल्या लढाया व १८१२ चा दुष्काळ यांमुळें कच्छची लोकसंख्या अर्धी कमी झाली.  १९११ च्या खानेसुमारींतील आंकडे खाली दिल्याप्रमाणें आहेत.  एकंदर लो.सं. ५१३४२९.  पैकीं हिंदू :- २९५४३६; मुसुलमान :- १२६१३३; जैन ६५२९८; पारशी ८० व ख्रिस्ती ६३.

सतीची चाल एके काळीं चालू होती.  ती बंद करण्यांत आली आहे व मुली मारण्याची चालहि हळूहळू बंद होत चालली आहे.  १८४२ त जाडेजा रजपुतांमध्यें पुरुषांचें स्त्रियांशीं प्रमाण ८:१ असें होतें.  ते १९०१ त सारखें झालें.  येथें कच्छी व गुजराथी पोटभाषा चालतात.  कच्छी भाषा ही गुजराथीची पोटभाषा असून फक्त बोलण्यांत उपयोगास आणतात.  याशिवाय फारशी व पश्चिमहिंदी या भाषा फारच थोड्या चालतात.

शेतकी - जमिनींत वाळूचा अंश बराच असून नांगरण्यास फार हलकी असल्यामुळें शेतें मोठीं म्हणजे सरासरी ३५ एकरी नंबर असतात.  गहूं, बाजरी, कापूस, कडधान्य, बागाइती जिन्नस हीं येथील मुख्य पिकें आहेत.

पाळीव जनावरांत, उंट महत्त्वाचा असून चपलतेबद्दल त्याची ख्याति आहे.  पूर्वी कच्छचे घोडे प्रसिद्ध असत.  परंतु अरबी व इतर घोडे येऊं लागल्यापासून त्यांची किम्मत कमी झाली आहे.

खनिजपदार्थ - कच्छमध्ये लोखंड व कोळसा सांपडतो, परंतु हल्लीं कोणत्याच खाणी चालू नाहींत.  पूर्वी पुष्कळ तुरटी तयार होत असे; परंतु चिनी तुरटीच्या चढाओढीमुळें व येथील तुरटीनें कापड खराब होत असल्यामुळें हल्लीं मागणी कमी झाली आहे.  खावद येथें पिंवळा संगमरवरी दगड सांपडतो.

व्यापार - कच्छचा बहुतेक व्यापार समुद्रावरून होतो.

आयात जिन्नस :- कच्चा माल, धान्य, लोणी, साखर, किराणा माल, फळें, इमारती लांकूड, लोखंड, तांबे व पितळेचीं भांडीं, लांकडी सामान, स्टेशनरी वगैरे.

निर्गत माल :- तुरटी, कापूस, कडधान्य, लसूण, चांदीचीं भांडीं, काळें कापड इ.

राजपुतानामाळवा रेल्वे झाल्यापासून कच्छचा मुंबई व कराची या बंदराशीं होणारा समुद्रावरचा व्यापार कमी झाला असें म्हणतात.  आगस्टच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंत मांडवी येथून अरबस्तान, मस्कत, सिंध, काठेवाड, मुंबई व मलबारचा किनारा इकडे गलबतें जातात.

एके काळी मांडवीं बंदराचा आफ्रिकेच्या किनर्‍यावरील झांजीबारशीं व्यापार चालत असे.  कशिद्याचें सुंदर काम व रेशमी काम यांबद्दल कच्छ प्रसिद्ध असून येथें रेशमाचें व कापसाचे कांहीं कारखाने आहेत.

दळणवळणाचीं साधनें - मुद्दाम तयार केलेले रस्ते या देशांत नसल्यामुळें पावसाळ्यांत प्रवास करणें दुष्कर होतें.  भूजपासून निघून मंडोई, रोहर व मुंदवाड येथें जाणारे तीन रस्ते मुख्य आहेत.

दुष्काळ - अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत ७ वर्षे दुष्काळाचीं गेली.  सर्वांत मोठा दुष्काळ १८१३ सालीं पडलेला होय.  त्यावेळीं अन्नाकरितां पुष्कळांनीं आपलीं मुलें विकलीं.  कुत्रें किंवा मांजर मिळालें असतां त्यावेळीं मोठी मेजवानी समजण्यांत येत असे व मनुष्याचें मांस खाण्यापर्यंत मजल गेलेली होती.  तेव्हांपासून १८९९ पर्यंत टोळधाड, उंदीर व अमर्याद पाऊस या कारणांनीं १५ वर्षे दुष्काळाचीं गेलीं.  १८९९-१९०० या सालीं केवळ दोन इंच पाऊस पडला.  यामुळें संस्थानचें फार नुकसान झालें.

राज्य व्यवस्था :-  कच्छवर निरनिराळे अंमल चालू आहेत ते पुढीलप्रमाणें :-
(१)  खालसा मुलुख.  हा खुद्द रावाच्या अंमलाखालीं आहे.
(२)  भायादांच्या जहागिरी; या रावाच्या घराण्यांतींल दुसर्‍या पुरुषांकडे वंशपरंपरेनें आहेत.
(३)  मोर्वीच्या ठाकुराकडे असलेला व अधोई नांवाचा देशाच्या मध्यभागचा सात गांव मिळून होणारा प्रदेश.
(४)  जाडेजा कोर्ट- यावर ब्रिटिश अधिकारी असून तो १८७५ च्या करारान्वयें त्याच्याकडे सोंपविलेल्या खटल्यांच्या चवकशींचें काम करतो.

या संस्थानांत ८ जिल्हे आहेत ते येणेंप्रमाणे :- अब्दास व नख्तरान, अंजार, बचौ, भूज आणि खावद, लखपत, मांडवी, मुद्रा आणि रापर व खादिर वरिष्ठ अदालत हें सर्व संस्थानकरितां दिवाणी व फौजदारी कोर्ट आहे.  १४ वर्षांपेक्षां जास्त सक्तमजूरी, जन्मठेप काळें पाणी व फाशींच्या शिक्षांनां रावाची संमति लागते.  याशिवाय ५३ दिवाणी व ४५ फौजदारी कोर्टे असून त्यांचे ३ प्रकार आहेत.  कांहींचीं अधिकार मर्यादा केवळ रावाच्या प्रदेशावर चालते.  दुसर्‍या कांहींची फक्त लहान सरदारांच्या जहागिरीवर चाले; व तिसर्‍या म्हणजे जाडेजा कोर्टाचा अधिकार सर्व संस्थानभर चालतो.  जाडेजा सरदारांपैकीं रावानें निवडलेले ४ सरदार व नायब दिवाण हे येथील न्यायाधीश होते.  भूज, मांडवीं व अंजार येथें म्युनिसिपालिट्या आहेत.

उत्पन्न - भायाद व दुसरे लहान सरदार यांच्या उत्पन्नासुद्धां या संस्थानचें एकंदर उत्पन्न सुमारें चाळीस लक्ष आहे.  त्यापैकीं दरबारचें उत्पन्न २५ लक्ष व बाकीचें जमिनदाराचें आहे.  येथील करवसूलीच्या पद्धतीला भाग बटाई असें म्हणतात.  उत्पन्नाचा एक सप्तमांश ते एक तृतीयांश सरकारास मिळतो.  वहिवाटीहक्काला येथें बरीच किंमत आहे.  तरी गिराशिया खेड्यांतील शेतकरी वाटेल तेव्हां काढून टाकतां येतात.  संस्थानी जमिनींत ज्यांनीं विहिरी खोदून किंवा कोरड्या जमिनीच्या जागी बागाईत तयार करून आपली योग्यता दाखविली आहे  त्यांनाच वहिवाटी हक्क मिळतो.

लष्कर - संस्थानच्या मदतीकरितां भूज येथें ब्रिटिश सैन्य ठेवलेलें असे.  पण हल्लीं तें काढून घेण्यांत आलें असून त्याबद्दल ब्रिटिश सरकारला ८२२५७ रुपये दिले जातात.

शिक्षण - १९११ त शें. ८ (पुरुषांपैकी शें. १४.९ व स्त्रियांपैकीं शे. १.०८) लोकांना लिहितां वाचतां येत होतें.  भायाद हे या बाबतींत फारच मागसलेले आहेत.  शिक्षणाची प्रगति नीटशीं दिसत नाहीं.  कारण १९२३ सालीं ४२ गांवांतील शाळा पैशाच्या अभावीं बंद कराव्या लागल्या, तेव्हां व्यापार्‍यानीं फंड उभारला

Comments